Sacrosanct – अतिपवित्र

“राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्या कारणाने मारहाण”

“साडीच्या पायाजवळच्या भागावर तिरंगा असल्याकारणाने जाहीर माफी”

“तिरंग्याच्या आकाराचा केक कापल्याकारणाने क्षमायाचना”

“सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक पणती”

“जवान देशासाठी इतकं करत असताना तुम्ही इतकं… ही करू शकत नाही?”

“सर्र, इस चीझ के बारेमे नही बोलनेका!”

“…. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं. यावेळी ते तिच्या अपयशाचं होतं. प्रेमातल्या आणि जीवनातल्या अपयशाचं ..डेथ सर्टिफिकेट. http://www.misalpav.com/node/35641”

वरील सगळ्या गोष्टींत सामान काये? वाचा.

माणूस हा सामाजिक प्राणी असला तरी त्याला त्याच्या फेलो प्राण्यांबरोबर ‘कनेक्ट’ व्हायला काहीतरी माध्यम लागतं. एकदा हे कनेक्शन जुळलं, की आपसूकच त्याला सर्वांहून वरचढ व्हायचा ध्यास लागतो. प्रयत्नांची योग्य जोड मिळाली की त्याला ते बऱ्याच प्रमाणात जमतंही. ह्यात बरीच प्रगती होऊ शकते/होते, आणि समाजाचं आरोग्य निकोप राहतं.

तर, ‘कनेक्ट’ कसे होतात लोक? ज्ञान/अर्थार्जनाच्या निमित्ताने, किंवा त्यांच्यातल्या समान दुव्याच्या आधाराने. ती एखादी (प्राप्त) कला असू शकते, किंवा (निसर्गदत्त) धर्म/जात/व्यंग इत्यादी. अशा संघटना साधारणतः एक गोष्ट/व्यक्ती अगदी शिरोधार्य मानून चालतात. ही गोष्ट त्या समान दुव्याच्या कळसस्थानी असते. हा सिम्बॉल सर्व सदस्यांसाठी Sacrosanct असतो. ह्या शब्दाचं विवेचन पुढे येईलच.

पुढे, कोणत्याही व्यक्तीला हा सगळा प्रकार फार ‘भारी’, किंवा सर्वमान्य वाटतो. त्यानंतर त्या व्यक्तीच्या व्यक्तित्त्वानुसार ती तीन मार्गांनी जाऊ शकते.

१. तो सिम्बॉल स्वतः शिरोधार्य मानणं

२. तसाच स्वतःचा दुसरा सिम्बॉल व पर्यायाने स्वतः वेगळा ‘कल्ट’ बनवणं

३. तो सिम्बॉल नाकारणं.

…प्रस्तावना बर्रीच लांबलीये.

इतकं सविस्तर, आदिम प्रेरणांपासूनचं विवेचन फक्त ह्यासाठी, की आजकालची प्रत्येक गोष्ट ह्या अशा sacrosanct बाबींनी भरलेली आहे. Sacrosanct ह्या शब्दाचा अर्थ होतो ‘अतिपवित्र’, किंवा टीका/विश्लेषण करण्यापलिकडे पवित्र.

मुळात ‘रॅटरेस’ चा काळ असल्याकारणाने प्रत्येेकाला आपली प्रत्येकच गोष्ट दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीपेक्षा किती श्रेष्ठ हे ओरडून सांगायचा अट्टाहास असतो. ह्या गोष्टीत आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा बहुमताची गरज असते, तेव्हा ह्या Sacrosanct गोष्टी फार मदतीला येतात. कारण, त्या निर्विवाद अतिपवित्र असल्यामुळे बहुतेक ज्यन्तेचं पाठबळ नेहमीच मिळतं.

त्यामुळे,

जेव्हा राष्ट्रगीतासाठी कोणाला उभं राहून,एका मिन्टात आपली देशभक्ती ‘सिद्ध’ करण्याची गरज नाटत नसेल, तेव्हा त्याला मारायला सरसावणाऱ्या पहिल्या हातास माहित असतं, की बाकी हात निर्विवादपणे मदतीस येतील.

सध्या अशी एक गोष्ट आपली देशभक्ती आहे. म्हणून रस्त्याजवळच्या शाळेतलं धूसर राष्ट्रगीत ‘रोजका ही है यार’ म्हणून दुर्लक्षिलं जातं, परंतु थेटरात उभं न राहणाऱ्यांना मारहाण करणं सहज जमतं. अशी अन्नेक उदाहरणं देता येतील. ही प्रतीकं आपल्या एकात्मतेची, अभिमानास्पद असली तरीही अशा वागणुकीमुळे त्यांना फुकाचं देवत्व बहाल होतं, आणि उगीच कोणीही उठून त्यांवर शिंतोडे उडवून शांतता धोक्यात आणू शकतो. उगीच भलत्याच वादांत ही Sacrosanct प्रतीकं घुसडून स्वतःचे मुद्दे पुढे रेटू शकतो, आणि बरंच काही. उ

गीच ‘bully’ करणाऱ्यांच्या हातात तर ही आयतीच कोलीतं मिळतात. सत्ताधारी ही प्रतीकं पुढे करून स्वतःच्या लफड्यांवर पांघरूण घालू शकतात, किंवा कमीत कमी पांघरुणं विकत घ्यायला वेळ तरी काढू शकतात. (संदर्भ: आजकालच्या घटना-शिवस्मारक इत्यादी आणि House of Cards.)

हे जवळपासच्या सगळ्याच गोष्टींत दिसून येतं. हे ‘आयडॉल्स’ एक व्यक्ती, धर्म, देव, संत, राजकारण्यांपासून अगदी सिरीअल्स, सिनेमे, कलाकार, बँड्स, ब्रँड्स, उत्पादनांपर्यंत. जनरली, हे ‘सगळ्यांना आवडतं’ म्हणून पब्लिक ह्यामागे पडतं. मला हे आवडत नाही म्हणणाऱ्याचं जे एलिअनेशन होतं, त्याला ९०% लोक घाबरतात, आणि त्या जथ्थ्यात सामिल होतात. अर्थात निर्विवादपणे जनमान्यता मिळणाऱ्या गोष्टीही असतात ह्यात, परंतु ह्या ‘फुगवून sacrosanct’ केलेल्याच जास्त. आणि एकदा ह्या गोष्टी ‘अतिपवित्र’ झाल्या, की त्यांतले दोषही गुणांसारखे दिसू लागतात. लोक त्यांच्यातल्या कोणाचीही हिरीरीने बाजू घेऊन भांडू लागतात, कायदेही हातात घेतात इ. थोडक्यात, लोक rationale विसरतात आणि अराजक माजते.

(उदाहरणार्थ:

छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोनपैकी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन अक्षरशः काहीही केलं तरी लोक ते पटकन मान्य करतात. नवीन होणारं शिवस्मारक असो किंवा काहीही. त्यांचं चित्र प्रचारापुरतं ब्यानरवर डकवणं असो, किंवा त्यांचं नाव घेउन स्वत:चे मुद्दे पुढे ढकलणं असो.

 

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर ह्यांच्यावर एआयबीच्या तन्मय भट ह्याने काढलेला व्हिडीओ. खुद्द त्या दोघांना नसेल पोहोचली इतकी तोशीस पब्लिकने स्वतः घेतली.

बाबासाहेब पुरंदरे ह्यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, त्याचा विरोध आणि पाठिंबा ह्यावारचं राजकारण.

अमिताभ बच्चनच्या लेव्हलला जायची शाहरूख खान ह्याची धडपड. आपल्या तद्दन मसाला चित्रपटांचं उदात्तीकरण इत्यादी.

गडकरींचा पुतळा उखडणे, आणि तो परत बसवण्यावरून झालेलं राजकारण.

सोशल मिडीया लेखक:-  Terribly tiny tales आणि तसे बरेच. पोलीस, डॉक्टर/नर्स, सैनिक, आई/वडील/भाऊ/बहीण ह्यांच्याबद्दल गोग्गोड लिहून स्वतः फार साहित्यिक असण्याचा आव आणणे, किंवा कथेतील पात्राचं व्यंग/मृत्यू सारख्या अतिपवित्र गोष्टी दाखवून कथा एकदम डीऽऽऽप करायचा प्रयत्न करणे. वरील उदाहरणांतलं शेवटचं पहा. दुसऱ्या एका दर्जेदार संस्थळावर ह्या कथेच्या धज्जीयाँ उडाल्या होत्या. मिसळपाव वर ते टिकलंय, आणि का, त्याचं कारण वर दिलेलं आहे.)

Leave a comment